गवती चहासाठी निचरा होणारी, पोयट्याची किंवा रेताड जमीन योग्य असते. या गवताच्या कठीणपणामुळे विविध प्रकारच्या हलक्या ते भारी जमिनीत हे पीक घेता येते. केरळमध्ये हे गवत, बरड व उताराच्या जमिनीवर लावतात, त्यामुळे जमिनीची धूप रोखली जाते. हे पीक एकाच जमिनीवर एकदाच लावल्यानंतर तीन ते पाच वर्षांपर्यंत राहते, त्यामुळे सर्व बाबींचे योग्य नियोजन करणे गरजेचे असते. सर्वसाधारणपणे खरिपामध्ये लागवड करावी. त्यासाठी मार्च ते एप्रिल महिन्यात उभी व आडवी खोल नांगरट करून घ्यावी. नंतर कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीस शेणखत/कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे.
लागवडीसाठी ठोंबापासून, तसेच बियांपासून रोपे मिळविता येतात, परंतु सर्व बाबींचा विचार करता ठोंबापासून केलेली लागवड योग्य ठरते. त्यासाठी सरी-वरंब्यावर लागवड केल्यास फायदेशीर ठरते. सरी पाडताना 75 सें.मी. अंतरावर सरी पाडावी व नंतर 45 सें. मी. अंतरावर ठोंबाची लागवड करावी. लागवडीसाठी लागणारे ठोंब 20-25 सें.मी. उंचीचे व एक ते दोन वर्ष वयाचे असावेत. पर्णोत्सर्जन टाळण्यासाठी ठोंबांची टोकाकडील पाने छाटून टाकावीत. अंतराचा विचार करता हेक्टरी 30 हजार ठोंबे लागतात. नियमित सिंचनाची सोय असणाऱ्या जमिनीत वर्षातून कधीही लागवड करण्यास हरकत नाही. हे पीक बहुवर्षीय असल्यामुळे रोपे मेलेल्या जागेत सतत नांगे भरावे लागतात.
सुधारित वाण –
केंद्रीय औषधी व सुगंधी वनस्पती संस्था – प्रगती, प्रमाण, कावेरी, कृष्णा, चिरहरित व निमा.
ओडाकल्ली- केरळ येथील संशोधन केंद्र- ओडी- 19, ओडी- 23 व ओडी-
440
जम्मू-काश्मीरच्या संशोधन केंद्र- सी.के. पी.- 25 व आर.आर.एल.- 16
जोरहटच्या संशोधन केंद्र- जी.आर.एल.- 1
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी- सी.के.पी.- 25 या जातीची महाराष्ट्रासाठी शिफारस केलेली आहे. या जातीची पाने गर्द हिरव्या रंगाची, कमी रुंदीची, पाण्याचा ताण सहन करणारी व त्याचप्रमाणे सिट्रॉलचे प्रमाण जास्त असणारी आहे.
या पिकासाठी माती परीक्षणानुसार खतांचा वापर करावा. शेवटच्या कुळवणीच्या अगोदर प्रति हेक्टरी 20 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. लागवडीच्या वेळी 40 किलो नत्र, 40 किलो स्फुरद, 40 किलो पालाश द्यावे. प्रत्येक काढणीनंतर हेक्टरी 40 किलो नत्राचा हप्ता द्यावा व ताबडतोब पाणी द्यावे. लागवडीनंतर लगेच पाणी देणे आवश्यक असते. ऋतुमानानुसार पाणी व्यवस्थापन करावे. हिवाळ्यात 12 ते 15 दिवसांनी व उन्हाळ्यात आठ ते दहा दिवसांनी पाणी द्यावे. उन्हाळ्यात पाण्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पाण्याचा ताण बसल्यास तेलाचा उतारा कमी मिळण्याची शक्यता असते. पावसाळ्यात आवश्यकता असल्यास पाणी द्यावे. या पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव हा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळतो. त्या वेळी पीक पहिले दोन-तीन महिने तणविरहित ठेवणे अत्यावश्यक आहे, त्यामुळे लावलेल्या रोपांची चांगली वाढ होऊ शकेल. त्याचप्रमाणे प्रत्येक काढणीनंतर एक खुरपणी करावी, म्हणजे वरची जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहण्यास मदत होते.